चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू   

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी वाघांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. मारोती शेंडे (६४, रा. वाढोणा, नागभीड) आणि ऋषी झुगांजी पेंदोर (७०, रा. भादुर्णी, मूल) अशी मृतांची नावे आहेत. 
 
नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील तलाव परिसरात मारोती शेंडे   हे आपली पत्नी व अन्य नागरिकांसह रविवारी सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी  गेले होते. तलाव परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला. हल्ला होताच त्यांनी आरडाओरड केली. सोबतचे वाचविण्यासाठी धावताच वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेंडे यांना सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 
दुसर्‍या घटनेत मूल तालुक्यातील भादूर्णी येथील ऋषी पेंदोर हे शनिवारी बकर्‍या चरण्यासाठी वनक्षेत्रात गेले होते. घरी परत न आल्यामुळे रात्री कुटुंबीयांनी शोधाशोध केली; परंतु शोध लागला नाही. वनविभागाने रविवारी सकाळी शोधमोहीम राबविली. शिवापूर चकच्या भागात जंगलात ऋषी पेंदोर याच्या शरीराचे अवयव आढळून आले. संपूर्ण शरीर वाघाने कुरतडले होते. नुकताच या गावात एका महिलेचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. दरम्यान, १० मे पासून चंद्रपूर जिल्ह्यात मानव-प्राणी संघर्षामुळे आठ मृत्यूंची नोंद झाली आहे.
 

Related Articles